सावित्रीबाई फुले

सावत्रीबाई फुले यांचे नावही आदराने
घेतले जाते. कारण स्त्री-शिक्षणाच्या त्या आद्य क्रांतिकारक होत्या. पुण्यात
स्त्री-शिक्षणाची सोय नव्हती. तेव्हा जोतिबांनी इ.स. १८४८ मध्ये मुलींसाठी पहिली
शाळा सुरू केली. मुलींच्या शाळेत काम करण्यासाठी शिक्षिकाही मिळत नसत. तेव्हां
जोतिरावांनी आपल्या अशिक्षित पत्नीला घरी लिहायला व वाचायला शिकविले व तिची
शिक्षिका म्हणून नेमणूक केली.
सावित्रीबाईंना स्वतःचे अपत्य झाले नाही, पण सर्व दीनदलितांना व अनाथांना जवळ करून
त्यांच्यावर सावित्रीबाईंनी पोटच्या मुलाप्रमाणे प्रेम केले व त्यांना अनेक
दुःखांपासून मुक्त करण्यासाठी, स्वतःच्या रक्ताचा थेंब व
क्षण वेचला. सावित्रीबाईंनी आपल्याला मूल न झाल्यामुळे जोतिबांना दुसरे लग्न
करण्याचा आग्रह केला, पण जोतिबांवर त्याचा काहीही परिणाम
झाला नाही. कारण त्यांचे पत्नीवर अढळ प्रेम होते. सावित्रीबाईंनी जोतिबांच्या
कार्यात उत्तम साथ दिली. सर्व टीका, छळ सहन करून एका थोर
समाजसुधारकाची जीवनसहचरी म्हणून, धैर्याने वागून जोतिबांचे
जीवन धन्य करण्यास त्यांना सर्वतोपरी साह्य केले. सावित्रीबाईंना उत्तम शिक्षण
मिळाले. जोतिबा फुले व सावित्रीबाईंचे शिक्षणाचे हे पवित्र कार्य चालू असताना,
त्यांच्या पवित्र कार्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न
जोतिबांच्या वडिलांनी केला. त्या काळात स्त्रियांना शिकविले जात नसे. जोतिबांच्या
वडिलांना असे वाटले की, त्यांच्या समाजसुधारणेच्या
कार्यामुळे धर्माला काळिमा लागेल, ४२ पिढ्या नरकात जातील. पण
सावित्रीबाई डगमगल्या नाहीत. जोतीबाही स्त्री-शिक्षण चळवळीचे नेते होते.
त्यांच्या मुलींच्या शाळेत, मुलींची संख्या हळूहळू वाढू लागली. पुण्यामध्ये
त्या काळात हे कार्य म्हणजे एक चाचेंचा विषय झाला होता. पण आपल्या कार्यामुळे
जोतिबा व सावित्रीबाईंनी एक प्रकारचा दरारा निर्माण केला होता. सावित्रीबाईंजवळ
विलक्षण चिकाटी व कठोरपणा होता. संत चोखामेळा मंदिरात सावित्रीबाईंनी महार-मांग,
कुणबी इ. लोकांच्या मुलींसाठी शाळा काढली. त्यांच्या सेवावृत्तीने
केलेल्या कामाचा गौरव इंग्रज सरकारने पुण्याला विश्रामबागवाड्यात केला.
स्त्री-शिक्षिकेचा हा पहिला गौरव होता. असा मान आतापर्यंत कोणालाही मिळाला नव्हता.
सावित्रीबाईंनी जे विचार मांडले, ते प्रत्यक्ष कृतीत आणले.
शाळेमध्ये सावित्रीबाईं मुख्याध्यापिका झाल्यावर त्या पवित्र ध्येयाने अध्यापनाचे
काम करीत. सावित्रीबाईंचा मानसिक छळ नातेवाईकांनी, समाजाने व
सनातन्यांनी केला. तसाच शारीरिक छळ करण्याचा विचारही काहींनी केला.
रस्त्यातून जात असताना एखादी कर्मठ
बाई शिव शिव करीत, तिच्या अंगावर शेणाचा
गोळा भिरकावून मारी. त्या शेणाची घाण, सावित्रीबाई न रागावता
स्वच्छ करीत. थोडे पुढे गेल्यावर कोणीतरी भगिनी झाडलेला कचरा माडीवरून त्यांच्या
अंगावर पडेल, अशा बेताने टाकीत. तेव्हा हसून सावित्रीबाई
म्हणत, 'बरे झाले बाई, तुम्ही ही फुले
टाकलीत, ही फुले उधळून तुम्ही माझा सत्कारच केला, ही फुलेच मला माझ्या विद्यार्थिनींना शिकविण्यासाठी उत्तेजन देतील.'
आणि ती भरभर शाळेकडे निघून जाई. एकदा शाळेकडे जाताना, चौकात चार-पाच गुंड मुले बसली होती. सावित्रीबाई तिथे आल्यावर
त्यांच्यापैकी एकजण पुढे येऊन म्हणाला, "मुलींना आणि
महार-मांगांना शिकविणे तू बंद करा. नाहीतर तुझी अब्रू शाबूत राहणार नाही." हे
शब्द ऐकताच त्या गुंडाला तिने ताड ताड अशा तीन मुस्काटीत ठेवून दिल्या. तो गुंड
मुलगा गाल चोळतच राहिला. अशा संकटांना तोंड देण्यास सावित्रीबाई समर्थ होत्या,
तरी जोतिरावांनी एक पट्टेवाला त्यांच्यासोबत दिला. जोतिरावांनी
काढलेल्या सर्व शाळांचा खर्च ते पदरमोड करून करीत असत.
दादोबा पांडुरंग तर्खडकर हे सरकारी
देशी शाळांचे पर्यवेक्षक असताना, त्यांनी
"इतक्या थोड्या वेळात शाळेने चांगली प्रगती केली, हे
त्या चालकांना भूषणावह आहे" असा शेरा दिला होता. त्या काळात विधवा महिलांचे
केशवपन होत असे. कारण विधवा स्त्रीने संन्यासिनीसारखे जीवन जगावे, अशी रूढी होती. तिला अपशकुनी समजले जाई. तिला पांढरे वस्त्र परिधान करून
घरातच कोंडून ठेवले जाई. सावित्रीबाईंनी स्त्रियांचे हे दुःख जवळून पाहिले
केशवपनाची दुष्ट रूढी नष्ट झाली पाहिजे, असे त्यांनी ठरविले.
परंतु लोक ऐकनात. तेव्हा जोतिबा आणि सावित्रीबाईंनी सर्व न्हाव्यांची एक सभा
बोलाविली आणि आपण आपल्या भगिनींवर वस्तरा चालवितो, हे केवढे
पाप आहे, याची जाणीव त्यांना करून दिली व त्यांना केशवपनस
जाऊ नका असे सांगितले. न्हाव्यांच्या हे लक्षात येताच त्यांनी संप पुकारला. तो खूप
गाजला.
सावित्रीबाईंनी बालहत्या प्रतिबंधक
गृह २८ जानेवारी १८५३ ला सुरू केले. बालविधवांचे दुःख त्यांनी जाणले. भ्रूणहत्येचा
प्रकार रोजच घडत आहे, असे त्यांनी पाहिले.
विधवांसाठी सुरक्षीतपणे बाळंतपण व्हावे, म्हणून बालहत्या
प्रतिबंधक गृह स्थापन केले. सावित्रीबाई शेकडो विधवांच्या माता झाल्या.
अस्पृस्यांसाठी जोतिबांनी पाण्याचे
हौद खुले केले. त्यात सावित्रीबाईंचा वाटा फार मोठा होता. इ.स. १८९३ साली सत्यशोधक
समाजाचे मोठे अधिवेशन सासवडला भरले होते. त्याच्या अध्यक्षा सावित्रीबाई होत्या.
तेव्हा त्यांनी आपले विचार परखडपणे मांडले.
सावित्रीबाईंचा पहिला काव्यसंग्रह १८५० साली तर दुसरा काव्यसंग्रह
१८९० साली प्रसिद्ध झाला. १० मार्च १८९७ साली पुण्याला प्लेगची साथ आली.
सावित्रीबाईंनाही प्लेगने घेरले. आणि त्या क्रांतिकारक स्त्रीने जगाचा निरोप
घेतला. स्त्री ही मानव आहे आणि ती पुरुषांइतकेच काम करू शकते, हे त्यांनी स्वतःच्या कृतीने सिध्द करून दाखविले.